१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.
देश स्वतंत्र झाला तरी देश चालवण्यासाठी घटना तयार नव्हती. ९ डिसेंबर १९४६ पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. १४१ दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता ३ नोव्हेंबर १९४७. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण १२ सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.आणि २६ जानेवारी १९५० ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात. १९५० मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतील, असं जाहीर करण्यात आलं. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.
१९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन.
मूळचे आंध्र प्रदेशातील परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्थायिक झालेल्या ‘अणे’ कुटुंबात २९ ऑगस्ट १८८० रोजी माधव श्रीहरी उपाख्य बापुजी अणे यांचा जन्म झाला . बालपणापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचे सर्व संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चालू असताना बापूजींना त्यांच्या कुटूंबातून प्राचीन वळणाचे शिक्षण दिले गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले. वैचारिक, सांस्कृतिक विषयाचे त्यांना जास्त आकर्षण होते, तसेच इंग्रजी व संस्कृत वाड:मय या विषयाकडे त्यांचा जास्त कल होता. मॉरिस कॉलेजमध्ये असताना बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला.
लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला. लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा तर बापूजींनी चालवलीच पण त्यांची वेद,पुराण व वाड:मयाच्या अध्ययन-संशोधनाचीही परंपरा त्यांनी पुढे चालविली. लोकमान्य टिळकांना बापूजी गुरु मानीत. महाराष्ट्रातील लोक बापूजी अणे यांना लोकमान्य टिळकांइतकाच मान देत असत आणि म्हणूनच बापूजी अणे ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून देखील ओळखले जातात.
बापूजी अणे स्वतःच्या मनाला योग्य वाटते आणि राष्ट्राला पोषक ठरते अशी कोणतीही गोष्ट करायला कधीही घाबरले नाहीत. बापूजी उदारमतवादी होते. त्यांनी प्रसिद्धीसाठी कधीही खटपट केली नाही. त्यांच्या सहवासात आलेला मनुष्य अगदी त्यांचाच होत असे. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बापूजी अजातशत्रू ठरले. ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा, तत्वनिष्ठा, निर्भयता, अभ्यासवृत्ती यामुळे बापूजींचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांच्यावरच्या जनतेच्या प्रेमामुळे जनतेने त्यांना ‘लोकनायक’ ही उपाधी बहाल केली होती. शिक्षक, वकील,वक्ता,साहित्यिक,संशोधक,कवी, धुरंदर राजकारणी,समाजसेवक अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पडणाऱ्या लोकनायक बापूजी अणे यांचा भारत सरकारने २६ जानेवारी १९६८ रोजी ‘पद्मविभूषण’ पदवीने सन्मान केला. तसेच त्यांच्या नावाने २९ ऑगस्ट २०११ रोजी डाक तिकीटही काढले
संदर्भ
https://www.bbc.com/marathi/india-47008003
https://www.sudarshannews.in/Madhav_Shrihari_Aney_news-5932-newsdetails.aspx