१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.
महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं, आणि आपला मराठी बाणा कायम ठेवला होता, राज्यात कोणतेही मोठे पद न भूषवता सर्व कारभार ज्यांच्या आदेशावरून चालायचा असे सर्व महाराष्ट्राचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते, त्यांचा स्वभाव आपल्या माणसांची आपुलकी, त्यांच्याविषयीच प्रेम शब्दात मांडणे कठीणच, त्यांनी शिवशेना पक्षाची स्थापना करून मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य महाराष्ट्रात पार पाडलं.
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती.
‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे, झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही ठाकरेंची होती. ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी "हिंदुहृदयसम्राट" म्हटले. 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणेही ठाकरेंच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.
१९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.
गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या 'रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत
कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते. नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
१९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.
धुंडामहाराज यांचा जन्म ह.भ.प. गुंडामहाराज देगलूरकर यांच्या संत घराण्यात इ.स. १९०४ (वैशाख शु. ३, शके १८२६) मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव ‘धुंडीराज’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे मनूबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे झाले. धुंडामहाराज लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांतच आईचेही निधन झाले. माता-पित्यांचे छत्र हरपल्यावर त्यांचे काका, थोर संत ह.भ.प. महिपती महाराज यांनी धुंडामहाराज यांचे पंढरपूर येथे पुत्रवत संगोपन केले.पंढरपूरच्या मठात महिपती महाराज देगलूरकर यांना भेटण्यास ह.भ.प. विष्णुपंत जोग महाराज आले असता छोट्याशा धुंडीराजची हुशारी पाहून ‘‘याला इंग्रजी शिक्षण न देता वारकरी सांप्रदायिक शिक्षणाचे, संस्कृत, मराठी संतसाहित्याचे धडे द्या,’’ असे सुचवून गेले.
अहोरात्र संत-साहित्याचे अध्ययन, चिंतन आणि संस्कृत ग्रंथांचे परिशीलन, तसेच पारंपरिक भजन यांचा ध्यास घेतलेली काही वर्षे गेली आणि वयाच्या विसाव्या वर्षी धुंडामहाराजांनी ज्ञानेश्वरीवर पहिले प्रवचन करून आपल्या ज्ञानेश्वरी सेवेचा श्रीगणेशा केला. आषाढ, शके १८४६ (इ.स. १९२४) मध्ये प्रारंभ झालेला हा ज्ञानेश्वरी सेवेचा वाग्यज्ञ पुढे अखंड, धुंडामहाराजांच्या निर्वाणापर्यंत शके १९१३ (इ.स. १९९२) पर्यंत सलग ६५ वर्षे सुरू होता.
संदर्भ
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80
https://maharashtranayak.in/daegalauurakara-dhaundairaaja-raamacandara